पुण्यात राजसाहेब "अँक्शन मोड" मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेगा बैठकीत ठरला "मास्टर प्लँन"
मनसेचं ‘एकला चलो रे’! भाजपसोबत युतीसंदर्भातील चर्चेला राजसाहेब ठाकरेंकडून पूर्णविराम
मा.राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना एकला चलो रे चा नारा दिला आहे. भाजपसोबत जाण्याबाबत आता लगेच निर्णय नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.
पुणे : शिवसेनेला आणि पर्यायानं महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजप आणि मनसेची युती होऊ शकते, या चर्चेला खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा दिला आहे. भाजपसोबत जाण्याबाबत आता लगेच निर्णय नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र येणार, या चर्चेला आता ब्रेक लागला आहे.
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेच्या 14 जणांच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेतली. ही बैठक जवळपास 2 तास चालली. यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी पालिका निवडणुकीसंदर्भात अहवाल देण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा देत कामाला लागण्याचे आदेश राजसाहेब ठाकरे यांनी दिले आहेत.
मनसेने परप्रातियांबद्दल भूमिका बदलावी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा नाही,असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मनसे आणि भाजप युतीबदल तुमच्याकडून चर्चा ऐकतोय, असंही पाटील म्हणाले. भारत हा एक देश आहे, त्यामुळे परप्रांतियांशी संघर्ष योग्य नाही. राज ठाकरे जोपर्यंत भूमिका बदलणार नाहीत, तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
त्याचबरोबर युती करण्याबाबत मनसेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही देखील त्याबाबत विचार केलेला नाही. मनसेची युती करायची झाली तर त्यांची अमराठी भाषिकांबद्दलची भूमिका त्यांना बदलावी लागेल, असंही पाटील म्हणाले होते
Comments
Post a Comment